हितेंद्र ठाकूर यांचा सवाल; भाजप, काँग्रेसवर टीका विजयाबाबत सुरुवातीपासून ठाम असणारे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पराभवाचे खापर भाजप आणि काँग्रेसवर फोडले आहे. काँग्रेसची पारंपरिक मते गेली कुठे? त्यांनी ही मते राखली असती तर आमचा विजय झाला असता, असे ते म्हणाले. मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रे बंद ठेवणे, प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि भाजपसह शिवसेनेने साम-दाम-दंड-भेद याचा वापर केल्याने पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडी या मतदारासंघात विजयाचा दावेदार मानले जात होती, मात्र बविआला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सुरुवातीला भाजप आणि बविआ या दोघांमध्ये चुरस होती. मात्र शिवसेनेने आघाडी घेत बविआला मागे टाकले. भाजपाने साम- दाम- दंड- भेदाचा वापर करून ही निवडणूक जिंकल्याचा आरोप पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. आमचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ३४ टक्के मतदान यंत्रे बंद होती. पालघरचे ७ लाख नागरिक दररोज मुंबईला जातात. त्यांचे मतदान होऊ नये यासाठी रचलेले हे षडयंत्र होते. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसची १ लाख ६५ हजार पारंपरिक मते होती. त्यांनी ती मते राखली नाहीत. ती मते कुठे गेली, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेसने ही मते राखली असती तरी विजय झाला असता असा दावा त्यांनी केला. २००९ ला काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र नंतर काँग्रेसने दगा दिला. त्यांची ताकद नसताना ते माझ्याकडे पाठिंबा मागायला आले होते. त्यांनी मला पाठिंबा दिला असता तर बविआचा विजय झाला असता, असेही ते म्हणाले. एक उपअधीक्षक दर्जाचा पोलीस अधिकाऱ्याला बढती देण्याचे आमिष दाखवून या मतदारसंघात पाठवले होते आणि तो त्यांच्यासाठी काम करत होता, असाही आरोप त्यांनी केला. या निवडणुकीत भाजपाने पैशांचा, नेत्यांचा महापूर आणला होता. ती ताकद ते २०१९ च्या निवडणुकीत लावू शकणार नाही. आमचे कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीत लढले. पुढच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.