डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथे राहणारे रिक्षाचालक दयाशंकर बुद्धिराम यादव यांनी प्रामाणिकपणा दाखवत त्यांच्या रिक्षात राहून गेलेला मौल्यवान ऐवज ग्राहकाला परत केला आहे. १२ जून रोजी मुलुंड येथील दिलीप डोंगसिंग लप्सा हे त्यांच्या रिक्षामधून प्रवास करताना बॅग विसरले होते. त्या बॅगेमध्ये एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाइल व काही रोख रक्कम होती. दयाशंकर यांनी ही बॅग विष्णूनगर पोलिसांच्या हवाली केली. विष्णूनगर पोलिसांनी प्रवासी दिलीप यांना त्यांची बॅग परत केली. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त संजय जाधव व विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांच्या हस्ते दयाशंकर यादव यांचा विष्णुनगर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.