भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयातील स्वच्छतागृहात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयकच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून रुग्णांचा आकडा चार हजारांच्या वर पोहचला आहे. रोज सरासरी दीडशेहून अधिक रुग्णांची भर पडत असल्यामुळे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत मीरा-भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील रुग्णांना स्वच्छतागृहात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता राखण्यात येत नसल्यामुळे स्वच्छतागृह तुंबून त्यातील मलमूत्र सर्वत्र पसरले आहे. तसेच इतर दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना त्याच स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना इतर साथीच्या आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. मीरा-भाईंदर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे अधिकचे १५ कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आयुक्तांची तडकाफडकी बदली करून डॉ. विजय राठोड या नव्या आयुक्तांना नेमण्यात आले आहे. परंतु अद्यापही शहरातील आरोग्य व्यवस्थेत कुठल्याही प्रकारचा बदल घडून न आल्याने रुग्णांची परवड सुरूच आहे. स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुन्हा अशा प्रकारची दुर्गंधी आढळून येणार नाही. - संभाजी वाघमारे,आरोग्य उपायुक्त प्रशासनामधील विभागाच्या आणि नागरिकांच्या परस्पर संवादामध्ये तफावत असल्यामुळे रुग्णांचे शारीरिक आणि मानसिक हाल होत आहेत. - दीप काकडे, युवा जिल्हा अध्यक्ष, मीरा-भाईंदर काँग्रेस