एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष मुलांचे शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवीत असल्याने त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा समाज कल्याण अधिकारी बी. ए. शिंदे यांनी येथे मांडले. अस्तित्व संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. सामान्य मुलांच्या शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. अपंगांच्या शाळांतील शिक्षकांसाठी अशी योजना नाही. या शाळेतील शिक्षक अशा पुरस्कारापासून वंचित राहतात. त्यामुळे अस्तित्व संस्थेच्या वर्धापन दिनाचे व शिक्षण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. या वेळी ठाणे जिल्ह्य़ातील अपंगांच्या शाळेतील ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्लता पाटील, मालती वानखेडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिंदे पुढे म्हणाले, पालकांनी आपल्या विशेष मुलांची जास्त काळजी घ्यावी, पुरस्कार विजेते शिक्षक तसेच इतर शिक्षक उत्तमरीत्या काम करीत आहेत असे सांगत त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहितीही या वेळी दिली.