‘वर्धमान गार्डन’मधील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीला लागून असलेल्या वर्धमान गार्डन्स या संकुलासमोरील सेवा मार्गावर बेकायदशीररित्या उभी राहिलेली भंगाराची दुकाने, पाण्याचे टँकर यामुळे येथील रहिवासी हैराण झाले आहेत. या अतिक्रमणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला. मात्र तरीही सेवा रस्त्यावरील ही अतिक्रमणे कायम आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या मन:स्थितीत येथील नागरिक आले आहेत. यशस्वीनगरमधील बाळकूम मार्गाजवळ वर्धमान गार्डन्स हे संकुल आहे. या संकुलात साधारण बाराशे लोक राहतात. या संकुलाच्या प्रवेशद्वारालगतच भंगार विक्रेते, गॅरेज, पाण्याचे टँकर आहेत. अनेक वाहने येथे बेवारसपणे उभी आहेत. त्यात काही शासकीय वाहनेही आहेत. संकुलापासून काही अंतरावर रस्ते बांधकाम करणाऱ्या मजूरांनी सेवा रस्ता आणि पदपथावर अनधिकृतरित्या २५० चौरस फूटाचे पत्र्याचे बांधकाम केले आहे. रस्ता बांधण्यासाठी आलेले हे मजूर रस्ता बांधून वर्ष होऊनही येथेच राहत आहेत. राहणारे मजूर उघडय़ावरच अंघोळ करतात. याबाबत अनेकदा तक्रार करुनही या मजुरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. याच सेवा मार्गावर दोन्ही बाजूस पाण्याचे टँकर उभे करुन एका टँकरमधील पाणी दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध जलवाहिनी सोडल्या जातात. त्यामुळे इतर वाहनांना वाहतूक करणे कठीण जात आहे. अपघाताची भीती संकुलाच्या बाजूलाच गॅरेज असल्याने येथे मोठय़ा प्रमाणात वाहने धुतली जातात. ते पाणी तसेच रस्त्यावर सोडल्याने स्त्यावरच ते पाणी सांडलेले असते. काही वेळा वाहनांचे तेलही पडलेले असते. सकाळी शाळेच्या मुलांची बसही येथे येत असते. त्यामुळे अपघाताची भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने रहिवाशांना आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.