‘लोकसत्ता आरोग्यभान’ वार्षिकांकाच्या प्रकाशन समारंभात तज्ज्ञांचे मत आहार, विहार आणि विश्राम हे आयुष्यात महत्त्वाचे घटक आहेत. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. आठ तासांची चांगली झोपही निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाची असते, असा उत्तम आरोग्याचा कानमंत्र व्यायाम प्रशिक्षक शैलेश परुळेकर यांनी दिला. बदलत्या जीवनशैलीनुसार मानवी आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपायांची माहिती देणारा ‘लोकसत्ता आरोग्यभान’ हा वार्षिकांक गुरुवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे प्रकाशित करण्यात आला. त्या वेळी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या प्राध्यापिका डॉ. संगीता पेडणेकर, बालरोगतज्ज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता विशेषतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर, परांजपे अथश्रीचे रवींद्र देवधर, पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजनचे डॉ. संदीप माळी आणि टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकसत्ता आरोग्यभान’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त ‘मानसिक संतुलनातून शारीरिक आरोग्याकडे’ या विषयावरील चर्चासत्र पार पडले. पारंपरिक जीवनशैली बदलत चालली आहे. आहार, आचार, विचार आणि उपचार या गोष्टी निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. हिरव्या भाज्या, पौष्टिक आहार घेऊन सुयोग्य व्यायाम करणे हे निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे, असे डॉ. संगीता पेडणेकर यांनी सांगितले. ताण हा प्रत्येकालाच येतो, २१ व्या शतकात तणाव हा मानवी आयुष्याचा एक भागच झाला आहे. प्रौढांमध्ये मानसिक ताण अधिक असल्याचे दिसते. वाढता ताण तणाव हा आरोग्याला घातक होत चालला आहे, मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची असल्याचे डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. या वेळी ‘लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परबदेखील उपस्थित होते. प्रेक्षकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरेही या चर्चासत्रात देण्यात आली. प्रायोजक थायरोकेअर प्रस्तुत ‘लोकसत्ता आरोग्यभान’चे परांजपे अथश्री आणि पितांबरी हेल्थकेअर डिव्हिजन हे सहप्रायोजक आहेत आणि ब्रह्मविद्या साधक संघ हीलिंग पार्टनर आहेत.