ठाणे जिल्ह्यातील वेगाने शहरीकरणाच्या दिशेने प्रगती करत असलेल्या कुळगाव-बदलापूर शहराला करोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. शुक्रवारी आणखी ७ रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. शहरात आतापर्यंत २७३ लोकांना करोनाची लागण झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात करोनाचे पॉजिटीव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं होतं. परंतू बुधवारी तब्बल २९ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातच एकच खळबळ माजली होती.

महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून येत आहे. शुक्रवारी आढळलेल्या ७ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत होते. एक रुग्ण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला होता. एका रुग्णाला करोनाची लागण नेमकी कशी झाली हे समजलं नसून एक तब्येत ठिक नसल्यामुळे उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये जात असताना त्याला लागण झाल्याचं कळतंय.

गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही तितकीच आश्वासक आहे, आतापर्यंत १४७ जणं उपचार घेऊन घरी परतले आहेत. शहरातील करोनाबाधित रुग्णांवर, पालिकेच्या रुग्णालयासोबत उल्हासनगर, ठाणे, डोंबिवली, भाईंदर, मुंबई येथे उपचार करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ६२ रहिवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.