जैवविविधता धोक्यात येण्याची भीती कल्पेश भोईर, लोकसत्ता वसई : मागील चार ते पाच दिवसांपासून वैतरणा, चिखलडोंगरी, यासह इतर ठिकाणच्या खाडीपात्रात पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांसारख्या दिसणाऱ्या ‘जेलिफिश’ प्रजातीचे मासे आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे जेलिफिश मोठय़ा प्रमाणावर जाळ्याला लागून येत आहेत. त्यामुळे इतर मासे मिळत नसल्याने मच्छिमार बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे. वसई सह पालघर जिल्ह्यात मोठय़ा संख्येने मच्छिमार बांधव हे खाडीपात्रात जाळे टाकून मासेमारी करतात. परंतु मागील काही दिवसांपासून या खाडीपात्रात मासेमारी करीत असताना जाळ्यात जेलिफिश मासे येऊ लागले आहेत.जरी हे जेलिफिश दिसण्यासाठी आकर्षक वाटत असले तरी ते घातक असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे. समुद्राला आलेल्या मोठय़ा भरतीमुळे व हे जेलिफिश खाडी पात्रात आले असल्याचा अंदाज मच्छीमारांची वर्तविला आहे. विशेष करून वैतरणा खाडी, चिखलडोंगरी, अर्नाळा खाडी किनारा, टेम्भीखोडावे या आजूबाजूच्या खाडी पात्रात हे मासे आहेत. हे जेलिफिश पांढऱ्या रंगाचे असून फुग्यासारखे शरीर असलेले आहेत. हे साधारण एक किलो व त्याहून अधिक वजनाचे आहेत. जेलीफिशने एखाद्याला डंख केल्यास व शरीराच्या इतर भागाला जरी त्याचा स्पर्श झाल्यास खाज सुटते व त्याठिकाणी लाल रंगाचे व्रण उठत आहेत. हे मासे जाळ्यात येत असल्याने जाळ्यांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. एका एका वेळेला साधारणपणे ३० ते ३५ असे हे जेलिफिश लागून येत असल्याने त्याला काढण्यातच मच्छिमारांचा वेळ जात आहे.आधीच करोनाच्या संकटाने अडचणी निर्माण केल्यात त्यात आता या जेलिफिश नावाचे संकट असेच राहिले तर येत्या काळात मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.खाडीच्या पात्रात पांढऱ्या रंगाचा जेलिफिश सापडत आहेत, असल्याचे सतीश गावड यांनी सांगितले. जेलिफिश घातकच * सध्याच्या स्थितीत वैतरणा खाडी पात्रात आढळून आलेला जेलिफिश हा ‘बॉक्स जेलिफिश‘ असून हा सुद्धा अतिशय घातक अशी माश्यांची प्रजाती आहे. * वातावरणाच्या बदलामुळे किंवा समुद्राच्या पाण्यात शेवाळ अधिक वाढल्यास जेलिफिश सारख्या प्रजातींची अधिक वाढ होते. हे जेलिफिश इतर छोटे छोटे मासे आहेत त्यांनाही खाऊन टाकतात त्यामुळे याचा मोठा जैवविविधतेवर होऊ शकतो. * जेलिफिशने दंश केल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगर यावरील उत्तम उपाय आहे. ज्या ठिकाणी दंश झाले आहे त्याठिकाणी तात्काळ लावल्यास वेदना कमी होऊन आराम मिळेल असे पालघर येथील प्राणीजीवशास्त्र अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले आहे. * जिल्ह्यात येत्या काळात प्रकल्प सुरू होतील त्यावेळी मोठय़ा प्रमाणात बाहेरून जहाजे येथे येतील तेव्हा त्यामध्ये असलेले ब्लास्ट वॉटर जे आहे ते इथल्या पाण्यात खाली केले जाईल. त्यापाण्यात असलेले सूक्ष्मजीवही यात येतील त्यामुळे इतर माश्यांची पैदास होऊन भविष्यात त्याचा परिणाम स्थानिक मच्छीमारांच्या मासेमारीवर होऊ शकतो असे प्रा. भोईर म्हणाले. मासळीची आवक कमी खाडी पात्रात जेलिफिश माश्यांचा शिरकाव झाला आहे. तेव्हापासून इतर प्रजातीचे मासे हे खाडीपात्रातून गेले आहेत. याचाच परिणाम हा मच्छिमार बांधवांच्या मासेमारीवर झाला आहे. जेलिफिशमुळे समुद्रात मिळणारे मासे ज्यावर या बांधवांचा उदरनिर्वाह चालतो तेच मासे कमी प्रमाणात मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.