पिंजाळ नदीवरील बंधाऱ्यामुळे सापणे गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार वाडा तालुक्यातील सापणे बु. येथील ग्रामस्थांनी पिंजाळ नदीवर लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली आहे. श्रमदानातून उभारण्यात आलेला हा बंधारा गावाच्या पाणीटंचाईवर मात करेल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. सापणे बु. गावच्या परिसरातील नागरिकांना पिंजाळ नदी जवळ असूनही नदीवर बंधारा नसल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्याकरता ग्रामस्थांनी लोकसहभागातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे या कामाकरता शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची मदत घेण्यात आलेली नाही. बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्यामुळे भाजीपाला पिकांसोबत गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. वनराई बंधारा बांधण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थी, तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. प्रशासकीय उदासीनतेवर नाराजी सापणे बु. येथील पिंजाळ नदीवर कोल्हापुरी प्रकारच्या सिमेंटच्या पक्क्या बंधाऱ्याची गरज आहे. मागणी करूनही आजपर्यंत येथे बंधारा बांधण्यात आलेला नाही. या बंधाऱ्यामुळे वाडा तालुक्यातील सापणे बु., करांजे, सापणे खुर्द ही गावे तसेच विक्रमगड तालुक्यातील कावळे, माले तसेच अनेक पाडय़ातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो मात्र प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे येथे आजपर्यंत बंधारा झाला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.