प्रस्तावित रस्त्याचा मार्ग बदलण्याचा फेरविचार जुचंद्र गावातील वादग्रस्त प्रस्तावित रस्त्याचे काम थांबविण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. या रस्त्यामुळे गावातील जुनी पाचशे घरे जमीनदोस्त होणार होती. अतिक्रमण कारवाई थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून रस्त्याच्या दुसऱ्या मार्गासाठी सर्वेक्षण केले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. वसई-विरार महापालिका हद्दीतील नायगावजवळील जुचंद्र हे प्रमुख गाव आहे. सिडकोने तयार केलेल्या विकास आराखडय़ात या गावातून रस्ता प्रस्तावित केलेला होता. लक्ष्मी सुपर मार्केट ते गिरीजा म्हात्रे शाळेपर्यंत हा रस्ता जाणार आहे. सिडको असताना त्यांनी विकास आराखडय़ात हा रस्ता प्रस्तावित केला होता. त्याचे काम आता महापालिकेने सुरू केले असून रस्त्याच्या मार्गात येणारी पाचशे घरे तोडण्यास सुरुवात केली होती. याबाबतचे वृत्त नुकतेच ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध झाले होते. यामुळे हजारो लोक रस्त्यावर येणार होते. या निर्णयाविरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. प्रभाग समिती ‘जी’चे सभापती रमेश घोरकना यांनी बांधकामे तोडण्याची मोहीम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामस्थांची घरे तोडून होणारा विकास आम्हाला नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घरे चाळीस वर्षांपासूनची आहे. केवळ सिडकोची परवानगी नव्हती म्हणून ती बेकायदा ठरविण्यात आली होती, म्हणून आम्ही ही मोहीम थांबवत असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्दय़ावरून लोकांची दिशाभूल करून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यायी रस्ता मोकळ्या जागेतून नेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.