वनविभागाचे पाऊल; १२०० बांधकामांवर कुऱ्हाड ठाणे : कळवा येथील घोलाईनगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका आणि वनविभागाच्या कारभारावर टीका होऊ लागली असून आता वनविभागाने कळव्यातील डोंगरावरील १२०० हून अधिक झोपड्या जमीनदोस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामे तोडली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आठ दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान कळव्यातील घोलाईनगर भागात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. १९ जुलैला ही घटना घडली होती. डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांमुळे वनविभागाच्या कारभारावर चौफेर टीका होत होती. त्यामुळे आता डोंगर उतारावरील झोपड्या हटवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. महापालिका आणि वीज कंपनीला यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता; आता पुन्हा पत्रव्यवहार करून अशा बांधकामांना सुविधा पुरवू नका, असे पत्र दोन्ही विभागांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. होणार काय? पारसिक, आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाईनगर, पौंडपाडा, वाघोबानगर आणि कारगिल खोंड या भागात सुमारे १२०० हून अधिक बांधकामे आहेत. ही सर्व बांधकामे डोंगराच्या तीव्र उतारावर आहेत. त्यांना आता नोटिसा पाठवण्यात येणार आहेत व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. कळव्यातील डोंगराच्या तीव्र उतारावरील १२०० बांधकामांना नोटिसा बजावून पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. - नरेंद्र मुठे, वनक्षेत्र अधिकारी, ठाणे