साथीच्या आजारांबरोबरच त्वचेच्या आजारांमध्येही वाढ ऊन-पावसाच्या लपंडावामुळे साथीचे आजार एकीकडे बळावले असताना दुसरीकडे त्वचाविकारांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे. त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही सध्या या रुग्णांचे प्रमाण दखल घ्यावी अशा पद्धतीने वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळ्यात ढगाळ वातावरण असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळामुळे ‘क्ष’ किरणांचा परिणाम होऊन त्वचेवर लाल चट्टे उठणे, पुरळ येणे अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कावीळ यांसारख्या आजारांमध्ये मोठी वाढ होत असते. मात्र याच काळात त्वचेचे विकारही बळावताना दिसतात. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे त्वचेच्या विकारांमध्ये वाढ होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, श्रावणात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होताच त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे उमटणे अशी लक्षणे वाढली आहेत. खासगी रुग्णालयात दररोज साथीच्या आजारांबरोबरच त्वचेच्या विकाराने त्रस्त असलेले रुग्ण दाखल होत आहेत. महापालिकेच्या त्वचाविकार केंद्राबाहेर रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा दिसू लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण खूपच अधिक आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्वचाविकाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची वर्दळ सतत सुरू असते, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शारीरिक जडणघडणींवर परिणाम होतो आहे. सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून पाऊस पडून गेल्यानंतर पडणाऱ्या उन्हाच्या ‘क्ष’ किरणांचा मारा त्वचेवर होताच लालसर पुरळ येणे, चट्टे येणे, त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच लहान मुलांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असल्याने त्यांच्यात त्वचा विकारांचे प्रमाण अधिक दिसू लागले आहे. -वीणा अय्यर, डॉक्टर