नवीन वाहतूक पर्याय शोधण्यासाठी एमएमआरडीए , सिडको सर्वेक्षण करणार हार्बर तसेच मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा वाढता भार कमी व्हावा यासाठी कल्याण ते तळोजा हा मार्ग सार्वजनिक परिवहन व्यवस्थेने जोडण्याच्या प्रस्तावावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने विचार सुरू केला आहे. विकास प्राधिकरणाने महानगर क्षेत्राच्या परिवहन व्यवस्थेचा र्सवकष असा अभ्यास सुरू केला असून या माध्यमातून या नव्या मार्गावर मेट्रो किंवा अन्य सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारता येईल का याचेही सर्वेक्षण केले जात आहे. सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव महानगर विकास प्राधिकरणापुढे मांडला होता. त्यानंतर यासंबंधीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणे-कल्याण-नवी मुंबईच्या त्रिकोणात गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण सुरू असून वारंवार चर्चेत येणारे मध्य रेल्वेमार्गावरील दिवा हेदेखील या त्रिकोणाचा एक भाग आहे. कल्याण, डोंबिवली, शीळ, तळोजा, महापे अशा मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. कल्याण ते वाशी आणि पुढे पनवेल असा प्रवास करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. सद्य:स्थितीत या मार्गावर प्रवासा करणाऱ्यांसाठी ठाणे-वाशी-बेलापूर-पनवेल ही रेल्वेसेवा महत्त्वाची ठरत आहे. वडाळा-ठाणे मार्गादरम्यान मेट्रो मार्गाला मंजुरी देत असताना ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या उपनगरांना नवी मुंबईशी जोडणाऱ्या अन्य परिवहन व्यवस्थांचा विचार करण्याचा प्रस्ताव सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मांडला होता. रेल्वे वाहतुकीवरील भार कमी करण्यासाठी तळोजा ते कल्याण हा मार्ग परिवहन व्यवस्थेने जोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंबंधीचा अभ्यास करण्याचे निर्देश मुंबई महानगर विकास प्राधिकरणास दिले होते. दरम्यान, सिडकोकडून मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाचा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गांभीर्याने विचार सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महानगर विकास प्राधिकरणाने संपूर्ण महानगर क्षेत्राचा र्सवकष परिवहन अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासातील शिफारशीनुसार तळोजा-कल्याण मार्गावर मेट्रो अथवा इतर परिवहन व्यवस्थेची पायाभरणी करता येते का याचा अभ्यास केला जाणार आहे. सिडकोने नवी मुंबईत तळोजा तसेच विमानतळापर्यंत मेट्रो व्यवस्थेची आखणी केली आहे. कल्याण ते तळोजापर्यंतचा मार्ग मेट्रोने जोडला गेल्यास थेट विमानतळापर्यंत परिवहन व्यवस्था उपलब्ध होऊ शकणार आहे. या अंगानेही या मार्गासंबंधी विचार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.