लाचखोरी, गैरव्यवहार करणारे ३८ कर्मचारी पुन्हा पालिका सेवेत दाखल बेशिस्तपणे वागणे, गैरव्यवहार करणे, कामात अनियमितता दाखविणे, नियमित कामावर न येणे, लाचखोरी अशा विविध कारणांमुळे वर्षभरात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ३८ कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या काळात आयुक्त ई.रवींद्रन यांनी निलंबित केले होते. या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना आयुक्त रवींद्रन यांनी पुन्हा सेवेत दाखल करून घेतले आहे. जुलै २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत अभियांत्रिकी, आरोग्य विभागातील एकूण ३८ कर्मचारी कणखर बाणा दाखवीत आयुक्त रवींद्रन यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. असे असताना पुन्हा या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा धडाका प्रशासनाने सुरू केला आहे. निलंबित निवृत्त शहर अभियंता पाटीलबुवा उगले, कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे ठेकेदाराकडून लाच स्वीकारत असल्याच्या चित्रफिती प्रसिद्ध होऊनही प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अभय दिल्याची चर्चा आहे. कल्याण पूर्वेतील पालिका कार्यालयाच्या एका दालनात बसून भर दुपारी कनिष्ठ अभियंता श्याम सोनावणे, ज्ञानेश्वर आडके, विनयकुमार विसपुते, महेश जाधव, जयप्रकाश शिंदे, सचिन चकवे हे गटारी साजरी करीत होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रतापांची चित्रफीत प्रसिद्ध होताच आयुक्तांनी त्यांना निलंबित केले. असे असताना हे सर्व कर्मचारी पुन्हा सेवेत परतले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीचे सोपस्कार उरकण्यात आले. उर्वरित दोषी अठरा कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही चौकशी न करताच त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. मागील महिनाभरात महापालिकेतील तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला जेजोराम वायले हा कर विभागातील कर्मचारी तर हंगामी पदावर कार्यरत आहे. तरीही त्याने लाच मागण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.