अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याणचा अग्रक्रमाने समावेश होऊनही कल्याण-डोंबिवली महापालिकेस त्याचे काहीच सोयर-सूतक नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातून कचऱ्याची वाहतूक करताना कोणत्याही प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केला जात नसल्याने शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचा खच पडू लागला आहे. कचरा संकलित करून त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून मोठय़ा प्रमाणात कचरा शहरातील रस्त्यावर पडत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील क्षेपणभूमीच्या प्रश्नावरून येथील बांधकाम परवानग्या देण्यावर र्निबध घालण्यात आले होते. हे निर्बंध उठल्यानंतरही येथील परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असून अनेकांना रस्त्याने चालताना दरुगधी आणि कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातून क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यासाठी जाणारी वाहने अनेक वेळा उघडय़ा स्वरूपाची असतात. शिवाय कचरा भरल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारे झाकण घातले जात नसल्याने हा कचरा रस्त्यावर पडत असतो. कचरा गाडय़ामधून कचरा क्षेपणभूमीपर्यंत झाकून व सुरक्षितपणे नेण्यात यावा, असे निकष असले तरी उघडय़ा वाहनातील कचरा जोरात वारा आला की रस्त्यावर पडतो. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर ओला कचरा असल्याने त्यातून पाण्याचीही गळती होत असते. रस्त्यावर पडलेल्या कचरा आणि पाण्यामुळे दुचाकीस्वार घसरुन पडण्याची शक्यता अधिक वाढू लागली आहे. अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या या कचरा वाहतुकीचा रस्त्यावरील वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरातील स्थानिकांना दरुगधाची सामना करावा लागत आहे. शहराच्या कचरा क्षेपणभूमीच्या प्रश्नावरून शहरातील नव्या बांधकाम परवानग्यांवर न्यायलयाकडून र्निबध घालण्यात आले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याच्या आश्वासनानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सीटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरातून होणारी कचऱ्याची खुली वाहतूक दुर्दैवी आहे. शिवाय ही वाहतूक करताना त्यावर ताडपत्री अथवा प्लास्टिकचे आवरण टाकले जात नसल्याने हा कचरा रस्त्यावर पडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने योग्य खबरदारी घेऊन कचरा वाहतूक करावी.
– योगेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते