नव्याने बांधकाम करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतीसाठी बांधण्यात आलेल्या खानिवडे बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हा बंधारा जुना असल्याने त्याला गळती लागली असून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा बंधारा नव्याने बांधावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यानंतर वसई तालुक्यात बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग येतो. यंदा पावसाळा लांबल्याने कामे करण्यास विलंब झाला आहे. सध्या तालुक्यात अडवणीच्या लाकडी फळ्या व माती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. वसईतील खानिवडे येथील कोकणी प्रकारातले बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले असून या बंधाऱ्याच्या पाण्याद्वारे खानिवडे, खराटतारा, नवसई, जांभूळपाडा, भाताणे, भालिवली येथील शेतकरी दरवर्षी सफेद कांदा, भेंडी, गवार, मुळा, पालक, कोथिंबीर, दुधी, कारली, टोमॅटो अशा प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. यंदा पाऊस अनियमित पडल्याने खरीप हंगापाने शेतकऱ्यांना धोका दिला. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी तयारीत आहेत, मात्र खानिवडे येथील बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षी पावसाळा संपताच तानसा खाडीवरील या बंधाऱ्यामुळे सभोवती असलेल्या डोंगरांवरून उतरणारे पाणी अडवून ते साठवले जाते. मात्र १९८४मध्ये म्हणजेच ३४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्यात समुद्राच्या भरतीचे पाणी मिसळून क्षारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे खानिवडे येथील शेतकरी विश्वनाथ कुडू यांनी सांगितले. यासाठी नवीन बंधारे बांधून देण्याची किंवा बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.