|| आशीष धनगर

रात्रीच्या वेळी शिळ फाटा मार्गावरून नोकरदारांचा पायी प्रवास

ठाणे : दिव्यातून मुंबईच्या दिशेने जलद गतीने ये-जा करण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवेशबंदी असल्याने दिव्यातील प्रवाशांना दररोज किमान पाच किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. मुंबई, ठाण्यातील कार्यालयांमध्ये जाण्यासाठी येथील नोकरदारांना बसने प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ठाण्याहून दिव्यात परतण्यासाठी नऊ वाजताची शेवटची बस सुटल्यावर येथील प्रवाशांना रिक्षांचा एकमेव पर्याय उरतो. मात्र, रिक्षाचालक अवाजवी भाडे आकारत असल्याने बरेचसे नागरिक रात्रीच्या वेळी शिळ फाटा ते दिवा असा पाच किलोमीटरचा प्रवास पायी करून घर गाठतात.

दिवा स्थानकातून ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यास लोकलने अवघी १४ मिनिटे लागतात. रस्ते मार्गाने हाच प्रवास करायचा झाल्यास शिळ फाटा येथील वाहतूक कोंडीचे दिव्य पार करावे लागते. त्यामुळे या प्रवासासाठी एक तासाहून अधिकचा वेळ लागतो. या रस्ते प्रवासाचा खर्चही अधिक आहे. यामुळे पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या दिवा भागातील बहुतांश नागरिक लोकल प्रवासाला प्राधान्य देतात. करोनाची साथ आल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे दिव्यातील नागरिकांना मुंबई-ठाण्यातील कार्यालये किंवा कामाचे ठिकाण गाठण्यासाठी बसने प्रवास करावा लागत आहे. महिनाभरापासून राज्य शासनाने खासगी कंपन्यांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिव्यातील नोकरदार वर्गाला सध्या बस प्रवासासाठी दोन तासांहून अधिक काळ रांग लावावी लागत आहे. त्यातच ठाण्याहून दिवा येथे परतण्यासाठी शेवटची बस रात्री ९ वाजता सुटते. त्यानंतर कामावरून घरी परतण्यासाठी दिव्यातील नोकरदार वर्गाला ओला किंवा उबेर या खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. खासगी वाहनांचे भाडे जास्त असल्यामुळे अनेक जण ठाण्याहून मुंब्रा आणि मुंब्य्राहून शिळ फाटा असा रिक्षाने प्रवास करतात. या प्रवासासाठी रात्रीच्या वेळी ८० ते १०० रुपये खर्च येतो. तर शिळ फाटा ते दिवा या पाच किलोमीटरच्या अंतरासाठी रात्री ९.३० नंतर रिक्षाचालक १०० ते १५० रुपयांची मागणी करतात. हा खर्च परवडत नसल्यामुळे दिव्यातील बहुतांश नागरिकांनी आता शिळ फाटा ते दिवा हा ५ किलोमीटरचा प्रवास पायी करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शिळ फाटा ते दिवा या मार्गावर चालत येणाऱ्या कामगारांचे जथे पाहायला मिळत आहेत.

मी ठाण्यातील वसंत विहार येथे कामाला असून दिव्याहून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दररोज १५० ते २०० रुपये खर्च करावा लागत आहे. अनेकदा कामावरून परत येण्यास उशीर झाला की रिक्षाचालक शिळ फाटा ते दिवा या प्रवासासाठी १०० ते १५० भाडे मागतात. त्यामुळे घरी पोहोचण्यासाठी चालत जाणे हा एकमेव पर्याय उरतो.

– ज्ञानेश्वर देवडे, दिवा

मी घोडबंदर येथील डी-मार्टमध्ये कामाला आहे. सध्या लोकल वाहतूक बंद असल्यामुळे बसचा प्रवास एकमेव साधन आहे. मात्र, बसची संख्या मर्यादित असल्यामुळे रात्री उशीर झाल्यास रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. पगार कमी असल्याने हे भाडे रोज भरणे परवडत नाही. त्यापेक्षा चालत जाणे सोयीचे ठरते.

– साई मयेकर, दिवा