‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’मधून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न; येत्या रविवारी विरारमध्ये कार्यक्रम

अरुंद रस्ते, बेसुमार वाहने, बेशिस्त रिक्षाचालक, नियोजनाचा अभाव आणि त्यात अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमणाने वेढलेल्या वसई आणि विरार या शहरांना मोकळा कधी घेता येणार , हा सध्याचा मोठा प्रश्न आहे.

शहरांमध्ये वाहतूक कोंडी तर नित्याची आहे. फेरीवाले तर कोणालाही न घाबरता थेट रस्त्यावर बस्तान मांडून आहेत. या साऱ्या  समस्यांना वाचा फोडण्यासाठी येत्या रविवारी, २८ जुलै रोजी विरार येथील विष्णू प्रतिभा सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रम होत आहे. वसई-विरारकरांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरारमधील जनतेचे आजवरचे खुले व्यासपीठ  म्हणून ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ उदयास आले आहे.

या वेळी पालिकेचे आयुक्त बी. जी. पवार, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील या कार्यक्रमात उपस्थित राहून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

वसई आणि विरार शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यातही रस्त्यांवर जागोजागी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट आहे. बेसुमार खासगी आणि बेशिस्त रिक्षावाले हा एक मुद्दा आहे.  हजारो अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. बेदरकारपणे चालणारे पाण्याचे टँकर, बेकायदा वाहनतळांची यात भर पडली आहे. वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. शहरात वाहनतळ नसल्याने वाहने उभी करण्याची समस्या निर्माण झालेली आहे. वाहने जप्त केली, तर ठेवायची कुठे, असा प्रश्न वाहतूक पोलिसांपुढे आहे. शहराच्या वाहतुकीच्या समस्येचे  निवारण करण्यासाठी वाहतुकीचा प्रस्तावित केलेला मास्टर प्लॅन लालफितीत अडकला आहे. हजारो अनधिकृत रिक्षा, टँकरने शहरात हैदोस घातलेला आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या साऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वसई-विरारकरांना प्रशासन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत.