दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’चा उपक्रम
ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची विशेष उपस्थिती
दहावी-बारावी हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. या परीक्षांतील यशानंतरच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीची दिशा ठरत असते. मात्र, बऱ्याचदा चांगले गुण असतानाही नेमक्या कोणत्या दिशेने करिअरची वाटचाल करावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम असतो. या सर्वावर मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आज व उद्या (२ व ३ डिसेंबर) ‘मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘विद्यालंकार’ने प्रस्तुत केलेल्या या कार्यक्रमाला ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’चे सहप्रायोजकत्व लाभले आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे सकाळी ९.३०पासून या कार्यक्रमास सुरुवात होईल. पहिल्या सत्रात शैक्षणिक कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षांच्या तणावाचा सामना कसा कराल? करिअर निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात करिअरमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व या विषयावर सॉफ्ट स्किल्सविषयक प्रशिक्षक गौरी खेर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. दहावी किंवा बारावीनंतर काय याचे समाधानकारक उत्तर करिअरच्या सुरुवातीलाच मिळावे आणि या दृष्टीने अभ्यासक्रमांची निवड करता यावी. तसेच विविध अभ्यासशाखांचे पर्याय यासंबंधी करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांच्याशी संवाद साधण्यात येईल. कार्यक्रमातील प्रत्येक सत्रानंतर विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

प्रवेशिका येथे मिळतील
’ लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा, ठाणे (पश्चिम).
’ हॉटेल टिपटॉप प्लाझा, एलबीएस रस्ता, तीन हात नाका, ठाणे (प).
’ विद्यालंकार क्लासेस, इशान आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रस्ता, ठाणे (पश्चिम).