ठाणे : सुप्रसिद्ध गीतकार आणि ज्येष्ठ कवी डॉ. मुरलीधर गोडे यांचे गुरुवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. गोडे यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले आहे. डॉ. मुरलीधर गोडे हे ठाण्यातील नौपाडा येथील भास्कर कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी ‘मी कशाला आरशात पाहू गं?’, ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’ या सारख्या अनेक अजरामर गीतांसह अनेक कवितांचे लेखन केले आहे. डॉ. गोडे यांनी मुंबई येथील रुईया महाविद्यालयातून संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी महाड येथील परांजपे विद्यालयात आणि ठाण्यातील बेडेकर विद्यालयात काही वर्ष अध्यपनाचे काम केले. गुरुवारी ठाण्यातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार गुरुवारी सायंकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात देहदान करण्यात आले.