मुंबईत नारळाचे झाड कोसळून महिला मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू ओढवला आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळी पाचपाखाडी भागात एक वृक्ष उन्मळून पडला यात दुचाकीवरून निघालेले उच्च न्यायालयातील वकिल किशोर पवार (वय ३८) हे गंभीर जखमी झाले होते. आज, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. याप्रकरणी, नौपाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. ठाण्यातील पाचपाखंडी परिसरातील किशोर पवार यांचा उपचारांदरम्यान काल संध्याकाळी मृत्य झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संततधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाचपाखाडी परिसरातील उदयनगर परिसरातील गोविंदभवन या सोसायटीतील जीर्ण झालेला वृक्ष शुक्रवारी सकाळी उन्मळून रस्त्यावरून दुचाकीवर कोसळला होता. या दुर्घटनेत मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरू घरी परतत असलेले वकील किशोर पवार यांच्या डोक्यात झाड पडल्यामुळे त्यांच्या मानेवर आणि डोक्याला दुखापत झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार हे किरकोळ कामासाठी गाडी घेवून जाताना हेल्मेटचा वापर करत असत पण घटनेच्या दिवशीच त्यांनी हेल्मेट घातले नाही आणि काळाने त्यांचा घात केला.

 

दरम्यान, ठाणे महापालिकेकडे सोसायटीने वारंवार तक्रारी करूनही जीर्ण वृक्षाबाबत काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी केला असून सबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.