अंबरनाथ येथील नालिंबी गावात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या आणि त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी संजय सिद्धार्थ नरवडे (२५) याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा केल्याची बाबही तपासात पुढे आली आहे.

अंबरनाथ परिसरात राहणारा गणेश रघुनाथ दिनकर (२७) आणि त्याची मैत्रीण गेल्या सोमवारी सायंकाळी नालिंबी या गावातून दुचाकीवरून जात होते. भिसोळ ते अंबरनाथ रस्त्यावरील दोनशे मीटर अंतरावर गणेश हा लघुशंकेसाठी थांबला होता. त्या वेळेस संजय याने पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडे मोटारसायकलची चावी मागितली होती. त्यास नकार दिला म्हणून संजय याने त्याच्यावर गोळी झाडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार केला आणि तिचा मोबाइल घेऊन पळून गेला.

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी या गुन्ह्यच्या तपासासाठी विविध पथके तयार केली होती. कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे रेखाचित्र तयार केले होते. या तपासादरम्यान दोन वर्षांपूर्वी अंबरनाथमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता. मात्र या गुन्ह्यात एक व्यक्ती जखमी झाली होता, अशी बाब पथकाच्या निदर्शनास आली.  तसेच या दोन्ही गुन्ह्यंतील आरोपींचे रेखाचित्र  मिळते-जुळते असल्याने पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून संजय याला ताब्यात घेऊन नंतर त्याला अटक केली.