कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठाण्यातील नरेंद्र बल्लाळ सभागृह, महापालिका, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे ‘नवी गाणी नवी कहाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य चित्रपट महोत्सवात पाच पुरस्कार मिळवणाऱ्या ‘नागरिक’ चित्रपटाच्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ‘नागरिक’ चित्रपटातील कलावंत, लेखक आणि गीतकार ठाणेकरांच्या भेटीला येणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या मराठीतील नव्या गीतकार आणि संगीतकारांचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास अनिरुद्ध जोशी, अनुजा वर्तक, आकांक्षा पालकर, रुचिता कांबळी, वीणा पाटील आणि हेमंत साने त्याचप्रमाणे प्रशांत काळूंद्रेकर, विशाल राणे, गिरीश महाडिक आदी गायक कलाकार उपस्थित राहणार आहेत. ‘नागरिक’ चित्रपटाचे लेखक डॉ. महेश केळुस्कर, गीतकार शाहीर संभाजी भगत, अभिनेते मिलिंद सोमण, जयप्रद देसाई आणि सचिन चव्हाण या वेळी काव्यवाचन करणार आहेत. कार्यक्रमाला गप्पागोष्टीकार जयंत ओक, हास्यव्यंग चित्रकार विवेक मेहेत्रे, कवी शशिकांत तिरोडकर, विनोद पितळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून सर्व ठाणेकरांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा मेघना साने यांनी केले आहे.