धवल कुलकर्णी

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर जमलेल्या हजारोंच्या जमावाचे प्रकरण ताजे असतानाच, संकटात असलेल्या महाराष्ट्रातील इतर राज्याच्या कष्टकऱ्यांना तत्परतेने मदत मिळाली नाही तर अशीच परिस्थिती इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकते अशी लक्षणं आहेत.

यंत्रमागाचे शहर असलेल्या भिवंडी मध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजुरांची वस्ती आहे. या लोकांपर्यंत मदत पोचवण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्ह्यातली यंत्रणा कमी पडत असून, यामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे असे समाजवादी पक्षाचे भिवंडी चे आमदार रईस शेख यांनी सांगितले.

याबाबत धोक्याची घंटा वाजवत शेख यांनी असे सांगितले की या मंडळींना मदत मिळावी यासाठी मी आतापर्यंत वारंवार मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकार्‍यांना सांगत आहे. परंतु दुर्दैवाने अजून पर्यंत तोच किंवा भरीव अशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही.

“यामुळेच समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते,” असे शेख म्हणाले. मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग असलेल्या शहरांमध्ये पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांतून मजूर येतात. शेख यांनी सांगितले की हे मजूर आपल्याला आपापल्या या राज्यांमध्ये परत जायचं आहे अशी मागणी करत आहेत. त्याचे कारण असे की त्यांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे.