ठाणे जिल्ह्य़ातील महापालिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या आठवडय़ात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवार १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान सुमारे ६० तास बंद राहणार आहे. महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा मंगळवार व बुधवारी काही भागांमध्ये बंद राहणार आहे.
पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी लघुपाटबंधारे विभागाने ठाणे पालिका प्रशासनास ३० टक्के तर एमआयडीसीला ४० टक्के पाणीकपातीचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसीकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते शनिवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा परिसरातील काही भाग, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र. १ या परिसराचा पाणीपुरवठा ६० तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेकडून स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यासाठी पालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा या परिसराचा पाणीपुरवठा मंगळवार १६ फेब्रुवारी सकाळी ९ ते बुधवार १७ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने एक वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे.