नव्याने निविदा प्रसिद्ध, वाहतूक कोंडी सुटणार अंबरनाथ : अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला कल्याण बदलापूर रस्ता लवकरच पूर्ण होणार असून आता हा रस्ता सहा पदरी होणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’च्या वतीने नव्याने सुधारित निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात अंबरनाथ फॉरेस्ट नाका ते उल्हासनगरच्या प्रवेशद्वारावर असलेल्या साईबाबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगरच्या वाहनचालकांना बदलापूर, नेरळ आणि पुढे कर्जत गाठण्यासाठी महत्वाचा असलेला कल्याण बदलापूर रस्त्याचे रूंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमधील वाढलेली अतिक्रमण त्यात प्रमुखअडथळा ठरली होती. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण निधी असूनही होऊ शकले नव्हते. अखेर प्रथम अंबरनाथ नगरपालिका आणि नंतर उल्हासनगर महापालिकेने धाडसी निर्णय घेत शेकडो दुकाने जमिनदोस्त केली होती. त्यानंतर रस्ता रूंदीकरण होणे अपेक्षित होते, मात्र रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह इतर कामांचा समावेश निविदेत न केल्याने अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका ते उल्हासनगरच्या साईबाबा मंदिरापर्यंतच्या कामासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होणारी सुविधा, इतर वापरासाठी मोकळी जागा यांचा समावेश करण्यात आला. तसेच अतिक्रमण हटवल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या शंभर फुटी जागेचा वापर करून यात आता सहा पदरी रस्ता तयार करण्याचाही विचार एमएमआरडीएच्या वतीने सुरू होता. तसा आराखडाही तयार करून निविदा तयार करण्यात आली होती. मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता असल्याने निविदा प्रसिद्ध करण्यात अडथळा निर्माण झाला होता.