पूर्ववैमनस्यातून उद्भवलेल्या वादातून एकाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्याच्या दोन मित्रांवर चॉपर आणि तलवारीने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली असून या घटनेत जखमींपैकी एकाची सोनसाखळी  काढून घेण्यात आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव, पक्या शिंदे, बंटी, बाबू यादव, आकाश गावस्कर, टॅटू, आबी, काळ्या आकाश आणि इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
किरण  कदम (२२) आणि जयेश  गवारी (२६) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदनवाडी परिसरात किरण, जयेश आणि त्यांचे मित्र गप्पा मारत असताना या आठ आरोपींसह इतर इतरांनी दोघांना हत्यारांचा धाक दाखवून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले अविनाश जाधव याने सूरज गुप्तासंबंधी विचारणा करून दोघांना मारहाण सुरू केली. टॅटू याने जयेशच्या हाताच्या कोपरावर चॉपरने वार करून त्याच्या गळ्यातील २० हजारांची सोनसाखळी काढून घेतली. गुंड कोंडू यादव याचा भाऊ बाबू याने किरणच्या अंगावर तलवारीने वार केले, तर आबी याने लोखंडी रॉडने किरणच्या डोक्यावर प्रहार केला.