अंबरनाथ तालुक्यातील नागरिकांना भूसंपादनासाठी नोटिसा सागर नरेकर, लोकसत्ता अंबरनाथ : कल्याणपलीकडे असलेल्या प्रवाशांची लोकल कोंडी टाळून उशिराचा शेरा दूर करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी) प्रस्तावित असलेल्या कल्याण बदलापूर रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी अखेर हालचालींना वेग आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित करण्यासाठी संबंधित जमीनमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याणपलीकडे असलेल्या उपनगरांमध्ये सर्वाधिक नागरिकांचे स्थलांतर अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि कर्जतच्या दिशेने होत आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दररोज लाखो प्रवासी खोपोली, कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथहून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. याच काळात कल्याण स्थानकातून मुंबईकडे येजा करणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाडय़ांमुळे सकाळी आणि विशेषत: सायंकाळच्या वेळी लोकल गाडय़ांना उशीर होत असतो. मार्गिकांची संख्या कमी असल्याने एकाच मार्गिकेवरून लोकलसह मेल, एक्स्प्रेस सोडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा लोकलचा खोळंबा होत असतो. हा त्रास कमी करून मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यासाठी रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३अ’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या मार्गिकांसाठी बदलापुरातील कुळगाव बदलापूर, बेलवली, मोरिवली आणि चिखलोली भागातील ७५ हजार ५३२.७९ चौरस मीटर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. त्यादृष्टीने उल्हासनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३४ भूधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. खासगी वाटाघाटीद्वारे ही जमीन थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याचे धोरण उपविभागीय कार्यालयाने अवलंबले आहे. भूसंपादन कायदा २०१३ नुसार एकूण मूल्याच्या २५ टक्के अधिक रक्कम मोबदला म्हणून देण्याची तयारी शासनाची आहे. त्यासाठी संमती असलेल्या भूधारकांना आपल्या जमिनीची समंतीपत्रे देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे. मार्गिकेचा प्रकल्प कल्याण ते बदलापूर अशा १४ किलोमीटरच्या दोन मार्गिका असतील. यासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईतून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण भारताला जोडण्यासाठी कल्याण - कर्जत रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत ही महत्त्वाची आणि वर्दळीची स्थानके आहेत. तिसरी - चौथी मार्गिका झाल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटून मेल, एक्सप्रेस, मालगाडय़ा आणि लोकलची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.