यादीत उशिरा समाविष्ट झाल्याने रुग्णाच्या घरी फवारणी आणि चौकशीचा जाच बदलापूर : कामानिमित्त मुंबई आणि उपनगरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरच करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांनी तिथेच उपचार घेत करोनावर मात केली. अशा रुग्णांची माहिती पालिकेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकतेस्थळावरून अनेकदा एक ते दोन महिने उशिराने मिळते आहे. मात्र, उशिरा मिळालेल्या माहितीची खातरजमा न करताच पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी रुग्णाच्या घरी फवारणी आणि तपासणीसाठी जात असल्याने उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांना आता मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने स्थानिक पालिका प्रशासनावरचा ताणही कमी होत आहे. शहरात चाचणी झालेल्या रुग्णांची माहिती मिळताच पालिका प्रशासन त्या रुग्णाच्या घरी जाऊन फवारणी करणे, इतर सदस्यांची माहिती घेत तपासणी करणे या गोष्टी करत असते. शहरातील चाचणी झालेल्या रुग्णांच्या माहितीसोबत शहराबाहेर चाचणी झालेल्या, बाधित झालेल्या, उपचार घेत असलेल्या आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती पालिकेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी उपलब्ध होत असते. अनेकदा अशा व्यक्तींची माहिती मिळण्यात पालिकेला उशीर होतो. त्यामुळे रुग्ण, मृत व्यक्तींची माहिती पालिकेला एक ते दोन महिन्याने प्राप्त होत असते. मात्र, अशा उशिराने प्राप्त झालेल्या माहितीमुळे करोनाच्या संकटातून सहीसलामत बाहेर पडलेल्या आणि बरे होऊ पाहणाऱ्या अनेकांना आता पालिकेच्या नित्यक्रमाचा त्रास होत आहे. बदलापूर शहरात असाच एक प्रकार समोर आला आहे. बदलापूर पूर्व भागात राहणारी एका व्यक्तीला दोन महिन्यांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला. शहराबाहेरच उपचार घेऊन ते बरे झाले. त्यानंतर त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. मात्र, एके दिवशी अचानक पालिकेचे पथक त्यांचे नाव विचारत गृहसंकुलात पोहोचले आणि त्यांना फवारणी आणि तपासणी करायचे असे सांगितले. करोनाबाबत भीती काही अंशी कमी झाली असली तरी करोना संसर्गित रुग्ण आढळतात गृहसंकुलात आजही अस्वस्थता पसरते. पालिकेच्या पथकामुळे संकुलात अशी अस्वस्थता पसरल्याने त्याचा मानसिक त्रास त्या व्यक्तीला झाला. अखेर त्या व्यक्तीने संतापून पालिकेच्या पथकाला परतवले. मात्र रुग्णाची माहिती मिळाल्यावर पालिकेने रुग्णाच्या सद्य:स्थितीची माहिती घेणे गरेजेचे आहे. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया त्या व्यक्तीने दिली आहे. असे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचेही कळत आहे. फवारणी होत नाही.. नोकरीनिमित्त मुंबई आणि उपनगरात जाणाऱ्या अनेकांना त्यांच्या व्यवस्थापनाने केलेल्या चाचणीतून ससंर्ग झाल्याचे समोर येते. अशा रुग्णांवर शहराबाहेरच उपचार होऊन ते बरे होऊन घरी परततात. त्यामुळे त्यांच्या संकुलात त्या त्या वेळी कोणतीही फवारणी, तपासणी होत नाही. मात्र अशा रुग्णांची माहिती ज्या ज्या वेळी मिळते त्या त्या वेळी पालिका त्या रुग्णांच्या पत्त्यावर घरी पोहोचते. त्याचा ती व्यक्ती, कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो.