निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पूल खचल्याचा आरोप लोकसत्ता वार्ताहर वसई : मागील काही दिवसांपूर्वी रखडलेल्या नायगाव खाडी पुलाचा एका बाजूचा भाग खचून गेला होता. परंतु हा भाग ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खचला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली होती. यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. नायगाव स्टेशनकडे ये-जा करण्यासाठी खाडी पुलावर नवीन पादचारी पूल तयार करण्याचे काम सन २०१४ पासून सुरू करण्यात आले होते. यापुलाच्या बांधकामाचा ठेका मेसर्स अजयपाल मंगल अँड कंपनी यांना देण्यात आला होता. परंतु विविध प्रकारच्या अडचणी यामुळे या पुलाच्या कामाची सातत्याने रखड्डपट्टी सुरू आहे. सध्या स्थितीत या पुलाच्या एका बाजूच्या उतार मार्गाचे पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या भागाचे काम सुरू आहे. याच सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी महिनाभरापूर्वी एका बाजूचा भाग खचून गेला होता. या पुलाच्या नायगाव बाजूचे आरसीसी बॉक्स रिटर्नचे बांधकाम २०१७ मध्ये करण्यात आले होते. त्यात माती भराव टाकण्याचे काम सुरू असताना संपूर्ण आरसीसी बॉक्स हा कलंडून साधारणपणे दीड ते दोन मीटर जमिनीत खचला होता. या झालेल्या दुर्घटनेमुळे पुलाच्या कामकाजावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. पुलाचे काम करताना योग्य रित्या पायलिंग न करण्यात आल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप काँग्रेसचे कॅप्टन नीलेश पेंढारी यांनी केला होता. या पुलाचे ठेकेदार यांना मेसर्स अजय पाल मंगल यांना आतापर्यंत कामाची ८५ टक्के रक्कम अदा करण्यात आल्याने त्याची अरेरावी वाढू लागली असून या घटनेची सखोल चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी कॅप्टन निलेश पेंढारी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. अखेर या प्रकरणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.