कोकण इतिहास परिषदेतर्फे रविवार, १७ जानेवारी रोजी शहरात इतिहासविषयक एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे हे सहावे राष्ट्रीय अधिवेशन असून, आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालय, रघुनाथनगर येथे होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख या अधिवेशनास उपस्थित असणार आहेत. गोव्याच्या इतिहासावर संशोधनपर लेखन केलेल्या डॉ. प्रकाशचंद्र शिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोकणचा समग्र इतिहास ग्रंथित करण्यासाठी कोकणातील प्राचीन लेणी, गुंफा, गड-किल्ले, वाडे, लोकजीवन, बोलीभाषा इत्यादींची माहिती गोळा करणे, संशोधकांना मार्गदर्शन करून शोधनिबंध तयार करून घेणे यासाठी कोकण इतिहास परिषद कार्यरत आहे. अभ्यासक, प्राध्यापकांनी तयार केलेल्या शोधनिबंधाचे वाचन अधिवेशनामध्ये करण्यात येणार आहे. दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शोधपत्रिकांची निवड करून शोधनिबंध खंड छापला जातो. या अधिवेशनात कोकण इतिहास त्रमासिक पत्रिका आणि शोधनिबंध संग्रह खंड ५ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोकणच्या इतिहासविषयक लिहिलेल्या उत्कृष्ट पुस्तकास परिषदेतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच डॉ. दिलीप बळसेकर यांचे प्राचीन विभाग, डॉ. दत्ता पवार यांचे मध्ययुगीन आणि डॉ. नीता खांडपेकर यांचे अर्वाचीन विषयावर व्याख्यान होणार आहेत. सकाळी ८ ते ५ या वेळेत हे अधिवेशन होणार आहे. गेली पाच वर्षे रत्नागिरी, ठाणे, गोवा, रायगड, शहापूर या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.