कल्याण, डोंबिवली परिसराला हादरवून टाकणाऱ्या नयन जैन या चिमुरडय़ाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी कल्याणमधील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील सर्व व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे प्रमुख बाजारपेठा दुपारपर्यत बंद होत्या.

नयनच्या मारेक ऱ्यांना कठोर शिक्षा द्या, विनाविलंब या प्रकरणाचा तपास करा, अशी मागणी यावेळी तहसीलदारांकडे करण्यात आली. गांधी चौक येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

यापूर्वीही कल्याण, डोंबिवली परिसरात खंडणीसाठी लहान मुला-मुलींचे अपहरण करून त्यांच्या हत्या करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर नयनच्या अपहरण व हत्येच्या घटनेनंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचेच दर्शन शुक्रवारी व्यापाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर काढलेल्या मोर्चात दिसून आले. व्यापाऱ्यांनी या मोर्चासाठी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत सकाळी संपूर्ण शुकशुकाट होता.