भावगीतांनी मराठीपण कधीही सोडले नाही. मराठी मातीशी त्यांनी आपली नळ घट्ट ठेवली आहे. अशी भावगीते आता विझायला लागली आहेत. भावगीते ही आपली पुण्याई, संचित आहे. ते वाया जाता कामा नये, असे मत डोंबिवलीतील महानगर मराठी साहित्य संमेलनातील ‘नाते शब्दसुरांचे’ चर्चासत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले. शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, भावसंगीत आदी विषय या वेळी चर्चेत घेण्यात आले. या चर्चासत्रात ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ गायिका सुलभा पिशवीकर, ज्येष्ठ गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी सहभागी झाले होते. प्रा. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले. अलीकडे नव्याने येणाऱ्या चित्रपटातील गाणी किमान काही दिवस तरी आपल्या लक्षात राहतात का, असा प्रश्न संगोराम यांनी उपस्थित केला. सिनेमातील गाणी अलीकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांच्यात कोणाता भाव नसतो. काही मिनिटांत गाणी तयार केली जातात. देवघेव संपली, की पुन्हा त्या गाण्यांकडे कोणी पाहत नाही. त्यामुळी ही गाणी झटकन पडद्याआड जातात. पण तसे भावसंगीताचे नाही. श्रीनिवास खळे यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराने अपार कष्ट घेऊन तिनशे गाणी दागिन्यासारखी घडविली आहेत. काळ पुढे जातोय तरी ही गाणी आपला पिच्छा सोडायला तयार नाहीत. एवढी ताकद या भावसंगीतात आहे, असे संगोराम म्हणाले. वर्तमान घडामोडींवर कविता.. कविसंमेलनात वर्तमान घडामोडी, सामाजिक व्यवस्थेवर कवींनी कविता सादर केल्या. मृणाल केळकर, शर्वरी मुनीश्वर, प्रज्ञा कुलकर्णी, माधव बेहरे, डॉ. अनिल रत्नाकर, गीतेश शिंदे, सुजाता राऊत, सुनंदा भोसेकर, कीर्ती पाटसकर, महेश देशपांडे, मानसी चाफेकर, जयवंत कुलकर्णी, विजय जोशी सहभागी झाले होते.