वर्षभरात १५हून अधिक वेळा मध्य रेल्वे कोलमडली

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार तांत्रिक बिघाड होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार काही नवे नाहीत. डोंबिवली ते दिवा दरम्यान गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकल गाडय़ा तांत्रिक बिघाडामुळे खोळंबून पडल्याची उदाहरणे सर्वाधिक असताना गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ-बदलापूर-वांगणी हा मार्गही अडथळ्यांची शर्यत ठरू लागला आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुन्हा एकदा याच मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने तासभर मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. याचा फटका इंद्रायणी एक्स्प्रेस व उपनगरी रेल्वे वाहतुकीला बसला. इंजिन बिघडणे, ओव्हर हेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे हे प्रकार या वर्षांत अनेकदा घडले आहेत. अंबरनाथ ते वांगणी या भागातच हे प्रकार का घडत आहेत, याचा शोध घेण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अंबरनाथ ते वांगणी या मध्य रेल्वेवरील स्थानकांवरून एक लाखापेक्षा अधिक प्रवासी दररोज ये-जा करत असतात. या स्थानकांवर प्रवाशांना सुविधांऐवजी अडचणींचा सामना अधिक करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून या अडचणीत नव्याने भर पडली आहे. या वर्षभरात रेल्वे मार्गात बिघाड निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याकडे रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांना बसत आहे. इच्छित स्थळी, घरी, नोकरीवर उशिरा पोहचणे असल्या प्रकाराने इथले नोकरदार संतप्त झाले आहेत. मध्यंतरी नागरकोईल एक्स्प्रेसचे इंजिन बिघडल्यानंतर काही नाराज प्रवाशांनी रेल रोकोही केला होता. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग आली नसून प्रवासी संघटनांनी आता रेल्वेला मोठय़ा आंदोलनांचा इशारा दिला आहे.

काय आहेत समस्या व मागण्या

*ओव्हरहेड वायर तुटणे, इंजिन बिघडणे, रेल्वे रुळाला तडा जाणे, सिग्नल बिघाड आदी समस्यांमध्ये वर्षभरात वाढ.

*बिघाडांमुळे रेल्वे अंबरनाथ-बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यानची वाहतूक वारंवार ठप्प होऊ लागली आहे.

*इंजिन बिघाड झाल्यावर कर्जत ते कल्याण येथून इंजिन येते, त्यामुळे वेळ जातो. एक इंजिन वांगणी येथील रेल्वे यार्डात उभे असणे  आवश्यक.

*वांगणी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने तर बदलापूर स्थानकात अरुंद पूल व अध्र्या फलाटावर छतच नसल्याने नागरिकांचे हाल.

खासदारांना वेळ नाही

अंबरनाथ रेल्वे स्थानक हे कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तर बदलापूर व वांगणी ही स्थानके भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या मतदारसंघात येतात. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील समस्या व रेल्वेतील तांत्रिक बिघाडांसंदर्भात खासदारांकडे अनेक तक्रारी पोहचल्या आहेत. बदलापूर ते वांगणी दरम्यान रेल्वेतील तांत्रिक दोषांच्या घटना जास्त घडल्या आहेत. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत आहे नंतर बोलतो, असे उत्तर दिले. तर खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अंबरनाथ ते वांगणीदरम्यान प्रत्येक ऋतूत तांत्रिक दोषांच्या समस्या उद्भवत असून याप्रकरणी आम्ही मुंबईत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी येत्या आठवडय़ातील बैठकीदरम्यान बोलणार आहोत. येथे आमचे समाधान न झाल्यास आम्ही थेट दिल्लीत महाव्यवस्थापकांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडणार आहोत.

राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशन