अंबरनाथ एमआयडीसीमध्ये रिक्षासाठी दीड तास ताटकळत; औद्योगिक प्राधिकरणाकडून दुर्लक्ष अंबरनाथ रेल्वे स्थानक ते अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहत हा सहा किलोमीटर अंतराचा प्रवास कापण्यासाठी पुरेशा दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना हाल सोसावे लागत आहेत. येथील औद्योगिक पट्टयात कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना रिक्षा, बसची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. सायंकाळच्या वेळेत या भागातून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी एक ते दीड तास रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनाची वाट पाहावी लागते. त्यामुळे मेक इन महाराष्ट्राची स्वप्न एकीकडे दाखवली जात असली तरी औद्योगिक पट्टयांमध्ये साधी दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासकीय यंत्रणांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला शासनाने १५ वर्षांपूर्वी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचा विचार करून अतिरिक्त अंबरनाथ ही नवीन वसाहत उभी केली. अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या कुशीत आणि शिळफाटा ते कर्जत या द्रुतगती रस्त्याला खेटून ही औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत जाण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून थेट बस सुविधा नाही. त्यामुळे कामगारांना रिक्षा प्रवासावर अवलंबून राहावे लागते. खरे तर एखादी नवी वसाहत उभारताना तेथील दळणवळणा संबंधीच्या सुविधांचा प्राधान्याने विचार करण्याची आवश्यकता असते. मात्र, या भागात तो झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी भागीदारी दर पद्धतीने रिक्षा प्रवास करून कामगारांना दररोज रेल्वे स्थानकापासून आपल्या कंपनीपर्यंत पोहचावे लागते. कंपन्या सकाळी सुरू झाल्या की सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मधल्या काळात कोणीही प्रवासी या भागात भाडय़ासाठी मिळत नसल्याने रिक्षा चालक या ठिकाणी फिरकत नाहीत. या भागात नियमित रिक्षा वाहतूक केली तर कामगारांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांचे भाडे मिळत नाही. त्यामुळे या भागात येणे परवडत नाही, असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. दिवसाला दोनशे रुपयांचे भाडे अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजक, कर्मचारी, कामगार मुंबई भागातून नियमित या भागात लोकलने येतात. त्यांनाही रिक्षेने कंपनीपर्यंत प्रवास करावा लागतो. काही उद्योजक आपल्या खासगी वाहनाने वसाहतीत पोहचतात. अंबरनाथ रेल्वे स्थानक ते औद्योगिक वसाहत असा एकटय़ाने रोज प्रवास करायचा ठरवले तर खिशात दररोज शंभर ते दोनशे रुपये भाडय़ासाठी तयार पाहिजेत. एवढा चढा दर रिक्षा चालकांकडून थेट प्रवासासाठी प्रवाशांना सांगितला जातो. वाहतूक प्राधिकरणही उदासीन संध्याकाळी कंपनी कामगार घरी जाण्यासाठी निघाला की अनेक वेळा एक ते दोन तास कामगारांना रिक्षा मिळत नाही. चुकून एखादी रिक्षा आली तर तिच्याभोवती दहा ते पंधरा कामगारांचा वेढा पडतो, अशी परिस्थिती आहे. या भागात राज्य परिवहन महामंडळाने किमान सकाळ, संध्याकाळच्या वेळेत या भागात बस सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून सुरुवातीच्या काळात प्रयत्न करण्यात आले होते. त्यास वाहतूक प्राधिकरणांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे ‘कामा’चे अध्यक्ष संजीव कटेकर यांनी सांगितले. महिलांचा नोकरीला टाटा वाहतुकीची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक महिला कर्मचारी नोकरीची गरज असूनही येथील कंपन्यांमधून काम सोडून गेल्या आहेत, असे काही उद्योजकांनी सांगितले.