दोन महिन्यांत श्वानदंशाच्या २५०० घटना; वसईकर हैराण

वसई-विरार शहरांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून गेल्या दोन महिन्यांत तब्बल अडीच हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेन. गेल्या वर्षीही शेवटच्या नऊ महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल साडे सहा हजार तक्रारी आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असून शहरात तीन नवीन श्वान निर्बीजीकरण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी विरारमधल्या चार लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांच्या शरीराचे लचके तोडले होते. या पाश्र्वभूमीवर भटके कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन महिन्यांत श्वानदंशाच्या तब्बल २ हजार ५२७ घटना घडल्या आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी ४० लोकांना श्वानदंश होतो. २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत साडेसहा हजार श्वानदंशाच्या घटना घडलेल्या होत्या. या वर्षीची आकडेवारी पाहता श्वानदंशाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ‘पालिकेच्या आरोग्य केंद्रात श्वानदंश झाल्यास औषधाचा पुरेसा साठा आहे. जखमींवर तात्काळ उपचार केले जातात. ज्या विभागात श्वानदंशांच्या जास्त घटना घडतात तेथे सर्वेक्षण करून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जातो,’ असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी सांगितले.

तीन नवीन निर्बीजीकरण केंद्रे

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणावर बंदी घालण्याची मागणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे पालिकेने शहरात आणखी श्वान निर्बीजीकरण केंद्रे उघडण्याचा निर्धार केला आहे. शहरात सध्या ४५ हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याची माहिती साहाय्यक प्रभाग समिती आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी दिली. सध्या पालिके कडे श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे एक केंद्र वसईच्या नवघर येथे आहे. तेथे १२ हजार ५५३ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मादी श्वानासाठी एक हजार पन्नास तर नर श्वानासाठी आठशे पन्नास रुपये खर्च येतो. त्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ६० लाखांची तरतूद केली आहे. हे एकच के ंद्र अपुरे असल्याने श्वानांच्या निर्बीजीकरणाची तीन आणखी केंद्रे स्थापन करणार आहोत. या वर्षी नारिंगी येथे मोठे केंद्र स्थापन करणार असल्याचे पालिका उपायुक्त डॉ. किशोर गवस यांनी सांगितले.

श्वानदंशाच्या घटना कालावधी श्वानदंश

१ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५       ६ हजार ८२८

जानेवारी २०१६   १ हजार ३०९

फेब्रुवारी २०१६   १ हजार २१८

शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली असून शहरात ४५ हजार भटकी कुत्री आहेत. त्यांच्या निर्बीजीकरणासाठी चालू अर्थसंकल्पात ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

– सुखदेव दरवेशी, साहाय्यक प्रभाग समिती आयुक्त

भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी वन्यजीव कायद्याच्या अडचणी आहेत; परंतु आम्ही अधिकाधिक श्वानांचे निर्बीजीकरण करणार आहोत. नारिंगी फाटा येथे दुसरे अद्ययावत निर्बीजीकरण केंद्र या वर्षी सुरू केले जाणार आहे.

– डॉ. किशोर गवस, पालिका उपायुक्त

श्वानदंश झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य केंद्रात तात्काळ उपाययोजना केल्या जातात. सर्व प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.

– डॉ. अनुपमा राणे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, महापालिका.