विष्ठा, घाणीमुळे रहिवासी हैराण; श्वसनाचे विकार बळावल्याच्या तक्रारीत वाढ वाढत्या शहरीकरणामुळे कावळे, चिमण्यांची संख्या एकीकडे कमी होत असली तरी डोंबिवलीतील काही भागांमध्ये कबुतरांची संख्या मात्र मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. मुंबईतील काही ठिकाणी असलेला कबुतरखाना बंद करा, अशी ओरड सातत्याने होत असतानाच डोंबिवलीतील नेहरू मैदान परिसरास कबुतरांचे थवेच्या थवे येऊ लागले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना श्वसनाचे त्रास वाढल्याच्या तक्रारी वाढू लागले असून नव्याने तयार होणारा हा कबुतरखाना वेळीच आवरा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करू लागले आहेत. डोंबिवली पूर्वेला नेहरू मैदानात कबुतरांचे थवेच्या थवे अवतरू लागले आहेत. सकाळ-संध्याकाळी काही पक्षिप्रेमी या ठिकाणीकबुतरांना खाण्यासाठी धान्य टाकतात. यामुळे येथे कबुतरांची संख्या वाढतच चालली आहे. कबुतरे निवाऱ्यासाठी लगतच असलेल्या इमारतींवर संसार थाटू लागले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर विष्ठा आणि दरुगधीमुळे रहिवासी त्रासून गेले आहेत. हे प्रमाण बरेच मोठे असल्याने काही रहिवाशांना श्वसनाचे विकारही जाणवू लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. नेहरू मैदान मुलांसाठी खेळण्याचे हक्काचे ठिकाण आहे. मुले खेळत असताना कबुतरांचे थवेच्या थवे उडतात. या थव्यामुळे नागरिकांना जखमा होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. काही नागरिक या कबुतरांना खाण्यास देतात. त्यास आमचा विरोध नाही. मात्र यामुळे येथे कबुतरांची संख्या वाढत असून आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे. आपल्या घराच्या अंगणात प्रत्येकाने कबुतरांसाठी धान्य ठेवावे. इतरांनाही त्रास होणार नाही याचा आणि त्यांच्या भावनेलाही धक्का बसणार नाही, असे या भागातील रहिवासी शालिनी गोरे यांनी सांगितले. पेंडसेनगर, सावरकर रोड, मुखर्जी रोड, नेहरू रोड आदि परिसरातील नागरिकांना या कबुतरांचा त्रास होत असून त्यांनी लोकप्रतिनिधींकडे याविषयी तक्रार गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी केली आहे. नागरिकांनी कबुतरांना धान्य टाकू नके याविषयीचे फलक येथे लावण्यात येतील, यामुळे कबुतरांचा त्रास होणार नाही, असे आश्वासन प्रतिनिधींनी नागरिकांना दिलेही होते. परंतु ते केवळ आश्वासनच ठरले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.