डोंगररागांमध्ये गुहा आणि लेणी खोदून त्यात वस्ती करून राहणाऱ्या प्राचीन मानवाने पठारावर येऊन केलेल्या वसाहतीचा सर्वात प्राचीन पुरावा तळकोकणात आढळून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कणकवलीतील हिवाळे गावात हे वास्तुशिल्प आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तेर गावात उभारण्यात आलेले बौद्धकालीन चैत्यमंदिर हा राज्यातील प्राचीन वास्तूचा आद्य पुरावा मानला जातो. कोकणातील ही वास्तूही त्याच अथवा कदाचित त्याही पूर्वीच्या कालखंडातील मानवी वस्तीची खूण आहे, असा दावा इतिहासतज्ज्ञ आणि कोकण इतिहास परिषदेचे उपाध्यक्ष रवींद्र लाड यांनी केला आहे. हिवाळे सडय़ावरील कृष्णा शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी लाड यांना ही गोलाकार वास्तू दाखवली. क्रिकेटच्या खेळातील पंचांच्या डोक्यावर असलेल्या टोपीसारखी या वास्तूची रचना आहे. या वर्तुळाकार इमारतीचा आतील भागाचा परीघ साधारण १५ ते २० फूट आहे. या वास्तूचे बाहेरील बांधकाम कोकणात आढळून येणाऱ्या जांभ्या दगडाचेच आहे. या इमारतीत वायुविजन तसेच उजेडासाठी दगडी खिडकीची सोय करण्यात आली आहे. आतील भागात एकही खांब नाही. बाहेरील बांधकामानेच त्यावर मेघुटी छत उभारण्यात आले आहे.गाळाने भरलेला तलावविहिरीलगत चौकोनी तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. जांभ्या दगडांनीच बांधलेला हा तलाव सध्या गाळाने भरला असला तरी पावसाळ्यात त्यात पाणी साचते. बारमाही विहीर या वास्तूपासून काही अंतरावर गर्द झाडीमध्ये एक पाच ते सहा फूट व्यासाची विहीर (रिंगवेल) आहे. आतल्या भागात ठरावीक अंतरावर मातीच्या रिंगा बसविण्यात आल्या आहेत. फारशी खोल नसली तरी जांभ्या दगडांनी बांधलेल्या या चिरेबंदी विहिरीत अद्याप पाणी आहे.शेजारच्या वस्तीला तसेच गुराढोरांना बाराही महिने ही विहीर पाणी पुरवते.गोलाकार वास्तू, त्यालगतची विहीर आणि तलाव या तिन्ही कोकणातील सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा आहेत. डोंगर आणि लेण्यांमधून मंदिर स्थापत्य कलेचा विकास होत असताना बांधलेल्या आद्य वास्तू नेमक्या कशा होत्या त्याचा हा एक उत्तम नमुना आहे. मौर्य आणि सातवाहनांच्या काळात डोंगरात मोठय़ा प्रमाणात लेणी खोदली गेली. त्यानंतर चौथ्या शतकात हळूहळू गाव वसाहती स्थापन होऊ लागल्या. कोकणातील ही वास्तूही त्याच कालखंडातील आहे. केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ही पहिली मंदिर स्थापत्य रचना आहे. - रवींद्र लाड, इतिहास संशोधक