कर्णावती एक्स्प्रेसने धडक दिल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा भाईंदर रेल्वे स्थानकात मृत्यू झाला. दुर्गेश वानखेडे असे त्यांचे नाव असून ते मुंबईतील मालाड येथे राहणारे होते. मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वानखेडे फलाटाच्या कडेला उभे असताना वेगाने येणाऱ्या कर्णावती एक्स्प्रेस गाडीकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही. फलाट क्रमांक पाच व सहा यांच्यामधील दोन रुळांच्यामध्ये वानखेडे यांचा मृतदेह सापडला असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे अपघात वाढले आहेत.