खोपोली ते ठाणे रेल्वे प्रवासादरम्यान गाडीतून पडून नरेश म्हादू पाटील (३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. गाडीतून पडल्यानंतर जखमी झाल्याने त्याला उपचाराकरिता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाण्यापलीकडील स्थानकांमध्ये प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या लोकल गाडय़ांमुळे सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी उसळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी डोंबिवलीतील भावेश नकाते याच्या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमातून समोर आल्यानंतर मंगळवारी सकाळीही असाच प्रसंग खोपोलीच्या नरेश म्हादू पाटील यांच्यावर ओढवला. खोपोली स्थानकातून ठाण्याकडे जाणाऱ्या नरेश कळवादरम्यान दारात उभा होता. गर्दीचा लोंढा वाढल्याने तो खाली कोसळला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
नरेश हा खालापूर येथील उंबरोली गावचा राहणार असून त्याच्या माता-पित्यांनी त्याचा देह ताब्यात घेतला, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांच्या वतीने देण्यात आली.