खारभूमी विभागाकडून ९ हेक्टर जागा वसई : भाईंदर पश्चिमेकडून वसई पश्चिमेला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवरील सहापदरी पुलाचा अडथळा दूर झाला आहे. यासाठी खारभूमी विभागाकडून ९.८६ हेक्टर जमीन ‘एमएमआरडीए’ला मिळाली आहे. यामुळे या पुलाचे काम सुरू होणार आहे. वसई-विरार शहराला मुंबईशी जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर ‘एमएमआरडीए’तर्फे सहापदरी पूल बांधला जाणार आहे. हा पूल कांदळवन वनक्षेत्र आणि खारभूमीच्या मिठागरातून जाणार असल्यामुळे परवानग्यांची आवश्यकता होती. या परवानग्यांव्यतिरिक्त ‘मुंबई मेरिटाइम बोर्ड’ (एमएमबी), ‘इनलँड वॉटरवेज अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयडब्ल्यूएआय) आणि ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटी’ (एमसीझेडएमए)च्या परवानग्यादेखील आवश्यक होत्या. त्यातील इतर परवानग्या मिळाल्या तरी खारभूमी विभागाची जागा मिळाली नव्हती. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुरुवारी खारभूमी विभागाकडून ९.८६ हेक्टर जागा ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’ने गुरुवारी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. सप्टेंबर २०२४ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे ‘एमएमआरडीए’ने यापूर्वी जाहीर केले होते. रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेले आहे. मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे एक ते दीड तास लागत होता. त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. त्यामुळे भाईंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा अशी पर्यायी मागणी समोर आली होती. २०१३ मध्ये ‘एमएमआरडीए’ने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. या पुलामुळे वसईहून भाईंदरला जाण्याचा वेळ वाचणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले. असा असेल पूल हा पूल विस्तारित मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)चा एक भाग आहे. हा पूल सहापदरी असून ४.९८ किमी लांब आणि ३०.६० मीटर रुंद आहे. १५०१.१६ कोटी इतकी या पुलाची अंदाजे किंमत आहे. पूर्वी राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा पूल ४ पदरी असणार होता. ‘एमएसआरडीसी’ने नेमलेल्या सल्लागारांनुसार हा पूल ५.६४ किमी लांबीचा आणि १.५ मीटर रुंदीचा होता. पुलावर तीन ठिकाणी १८० मीटर लांबीचे ‘केबल स्टे’ असावे अशी सूचना त्यांनी केली होती. नवघर-माणिकपूर नगर परिषद असताना या खाडीपुलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे ठेवण्यात आला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८ पर्यंत तो अकराशे कोटींवर पोहोचला होता तर आता या पुलाचा खर्च पंधराशे कोटींवर गेला आहे.