थुंकणाऱ्यांनी तीन महिन्यांत आकर्षक भित्तिचित्रे रंगवली; रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष ठाणे रेल्वे स्थानकातील गलिच्छ भिंती स्वच्छ करून त्यावर आकर्षक भित्तिचित्रे साकारण्याला तीन महिने लोटतात न लोटतात तोच या सुशोभीकरणावर पिचकारी बोळा फिरवला आहे. मुंबई-ठाणेदरम्यान धावलेल्या पहिल्या रेल्वेगाडीच्या चित्रासकट सर्वच चित्रांवर थुंकून ती विद्रूप करण्यात आल्याने सुजाण प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. स्थानक स्वच्छ राहावे, भिंतींवर थुंकण्यात येऊ नये, यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची त्यामुळे वाताहत झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील रंग उडालेल्या भिंती, धुळीने माखलेला परिसर आणि कोळिष्टके हटवून ठाणेकर तरुणांनी त्याला सुशोभीकरणाची झळाळी दिली. स्थानकातील प्रमुख दर्शनी भागामध्ये विविध वैशिष्टय़पूर्ण चित्रांची रंगरंगोटी करण्यात आली होती. सुमारे महिनाभर राबून विविध महाविद्यालयांतील आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या सजावट प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. स्थानकात ठाण्याचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या घटनांचे प्रसंग भिंतीवर चितारण्यात आले होते. त्यामध्ये ठाणे-मुंबईदरम्यान धावलेल्या पहिल्या रेल्वेचे चित्र प्रवाशांचे लक्ष वेधणारे ठरले. विशेष म्हणजे ठाण्यात येणाऱ्या तरुणांसाठी हे चित्र सेल्फी काढण्याचे ठिकाण बनले होते. स्थानकाची रंगरंगोटी आटोपून या तरुणांनी एप्रिल महिन्यात हे काम पूर्ण केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये यावर पिचकारीबहाद्दरांनी बोळा फिरवण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने चित्राच्या वरील भागातील पुलावर पत्रे बसवले. मात्र, तरीही रेल्वेची भिंत पूर्णपणे पिचकाऱ्यांनी भरून गेली आहे. सोशल युनिटी केअर संस्थेच्या सदस्यांनी मोठी मेहनत करून ठाणे रेल्वे स्थानक सुशोभीकरण केले आहे. त्यांच्या मेहनतीवर काही प्रवासी अस्वच्छता पसरवत आहेत. हे कलाकारांसाठी वेदनादायक आहे. स्थानकात सीसीटीव्ही, पोलीस आणि सुरक्षा दलाने संयुक्तपणे अशा थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. - अमित शर्मा, सोशल युनिटी केअर संस्था