वसईतील भातशेती करपली; कृषी विभागाचा शासनाला अहवाल वसईत आलेला पूर आणि नंतर अचानक पावसाने मारलेली दडी याचा फटका वसईतील भातशेतीला बसला आहे. वसईच्या ग्रामीण भागातील भातशेती करपली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागानेही याबाबत शासनाला अहवाल पाठवला आहे. वसईतील अनेक भागांत मोठय़ा प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते. पावसाची चांगली सुरुवात झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पीक येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पूरस्थितीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर उरल्या सुरल्या पिकावरच शेतकऱ्यांची आशा होती. परंतु मुसळधार पडणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून गायब झाला आहे आणि आता कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे शेतातील कणसे करपून निघाली आहेत. टुमदार दिसारणारे कणीस भरण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती, परंतु अचानकपणे पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या हवामानामुळे ग्रामीण भागातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे आदिवासी शेतकरी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून पाऊस न पडल्याने शेतीचे नुकसान झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही शासनाकडे अहवाल पाठवला आहे आणि योग्य ती मदत देण्याचा प्रयत्न आहे. - पृथ्वीराज पाटील, अधिकारी, कृषीविभाग, वसई