पालघरमध्ये जमावाने मारहाण करत तिघांची हत्या केल्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्यासाठी स्थानिकांनी ऑनलाइन मोहीम सुरु केली आहे. गौरव सिंह यांची पुन्हा नियुक्ती केली जावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले भागात झालेल्या हत्याकांड प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

पालघरमध्ये व्यायामशाळा चालवणारे सुजित सिंह आणि सामाजिक कार्यकर्ते करण चौधरी यांनी ही ऑनलाइन याचिका सुरु केला आहे. याचिकेतून त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांकडे गौरव सिंह यांनी पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. change.org वर असणाऱ्या याचिकेला ३५० हून अधिक जणांनी समर्थन दिलं आहे.

गौरव सिंह यांना ८ मे रोजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. याचिकाकर्त्यांनी याचिकेत गौरव सिंह यांनी जिल्ह्यातील वाळू माफियसारख्या बेकायदा गोष्टी, गुटखा, दारु माफिया यांना हद्दपार करण्या मदत केल्याचं सांगितलं आहे. सोबतच पोलिसांची एक चांगली प्रतिमा समाजात उभी केली होती, ज्यामुळे लोकांना पोलिसांची भीती वाटत नव्हती असंही याचिकेतून सांगितलं आहे.

“आम्ही जिल्ह्यातील अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. यानंतर त्यांनी त्यावर तात्काळ कारवाई करत येथील लोकांचं मन जिंकलं होतं,” असं आसिफ धनानी यांनी सांगितलं आहे. आसिफ यांनीही याचिकेला पाठिंबा दिला आहे. “पोलीस अधिक्षक आमच्यासाठी एक महत्त्वाची व्यक्ती असून त्यांना पुन्हा आणलं पाहिजे आणि दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु दिला पाहिजे,” अशी मागणी डॉक्टर हितेश चौरी यांनी केली आहे.

दरम्यान सीआयडीने पालघर हत्येप्रकरणी अजून १२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. यासोबत अटक झालेल्यांची संख्या १४६ झाली आहे.