गेल्या अनेक वर्षांपासून गाळाने भरलेल्या चोणच्या तलावातील गाळ काढण्यासाठी अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांनी पुढाकार घेतला असून लोकसहभागातून या तलावाची स्वच्छता केली जाणार आहे. बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या चोण गावात जवळपास १४ एकर क्षेत्रफळात पसरलेला विस्तीर्ण असा तलाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यात गाळ साचल्याने तलावाची पाणीक्षमता घटली होती. तसेच तलावाशेजारी असणाऱ्या विहिरीही आटल्या होत्या. त्यामुळे गावकऱ्यांना बारवीच्या प्रवाहातून पाणी उचलावे लागत होते. यात गावकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाया जात होता. प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत होते. यासंबंधीचे वृत्त लोकसत्तामध्ये २० एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरात गाळ काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली.तर गावातील काही सुज्ञ नागरिकांनी गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.