प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सामाजिक कविता लिहिणे हे एक व्रत आहे. बहुपेडी समाजाच्या सर्व स्तरांचा वेध आणि शोध घेवून शब्दांमध्ये अभिव्यक्त होणे ही एक वेगळी साधना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा.अशोक बागवे यांनी केले. ते साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी लिहिलेल्या पहिल्या ‘पानगळीची सळसळ' या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलत होते. पाळगळीच्या सळसळीचा अंतस्थ आवाज ठाणेकरांना ऐकू आला, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. साहित्याच्या माध्यमातून वास्तवाचा विस्तव पेलण्याची लिलया डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना विशेष जमली आहे, असे ते म्हणाले.डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा 'पानगळीची सळसळ' हा पहिला कविता संग्रहामुळे मला सामाजिक वास्तवाची दाहकता मनाला स्पर्शून गेली, असेही ते यावेळी म्हणाले. तथाकथित कोणत्याही प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर न करता थेट, रोखठोक शब्दांत अनुभव पोचविण्याची त्यांची हातोटी मला विलक्षण, प्रभावी आणि परिणामकारक वाटली. बुरसटलेले स्वार्थी राजकारण, एकारलेले धर्मकारण, सामाजिक विषमता, भ्रष्टाचाराचा सुस्त अजगर तसेच आसपास घडणाऱ्या अनेक घटकांचा धांडोळा डॉ. घुमटकर यांनी कमालीच्या त्रयस्थपणे घेतला आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला कवी नारायण तांबे, कवयित्री नलिनी कुडूक, सदाशिव देवकर, ललिता गवांदे, विद्या वाहुले, कवी बाळासाहेब तोरस्कर, सतीश सोळांकुरकर कवी भगवान निळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यकमाचे प्रास्तावित लेखक व कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी केले. श्याम माळी, कृष्णकांत कुलकर्णी, अनिल तगडे, मीना कुलकर्णी, जयंत भावे आदी मान्यवर कवींनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अरुधंती भालेराव यांनी केले.