मे महिन्याच्या सुरुवातीलाच ब्लॅकबर्ड पक्षी उत्तर भारतातून स्थलांतर करून आपल्या ठाणे-कोकण पट्टय़ात येतात. पावसाळा हा ब्लॅकबर्ड पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे हिमालयातून इथे आलेले हे पक्षी लगेचच घरटे बनविण्याच्या उद्योगाला लागतात. अगदी जून महिन्याच्या सुरुवातीलाच गवत, काटक्या, मुळ्या, शैवाल, पाम, सुपारी वा नारळाच्या पानाचा धागा वापरून ते खोलगट कपाच्या आकाराचे सुरेख घरटे बनवितात. या घरटय़ाला आतून पाल्याचे अस्तर असते. घरटे तयार होताच मादी तीन ते पाच लाल ठिपके असलेली निळसर अंडी घालते. साधारण तीन बाय दोन सेंटीमीटर आकाराच्या या अंडय़ांची निगा राखण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात. ब्लॅकबर्ड पक्षी स्वभावाने तसे खोडकरच असतात. तित्तर, घार, सातभाई अशा अनेक पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल हे पक्षी करतात. संकटसमयी एकमेकांना सावध करणाऱ्या विशिष्ट शिळेचीही हे पक्षी हुबेहुब नक्कल करतात. पावसाळा जर चांगला असेल तर हे पक्षी ऑगस्ट महिन्यात दुसरी वीणही घेतात. क्वचित प्रसंगी विणेनंतर रिकामे झालेले ब्लॅकबर्ड पक्ष्याचे घरटे अन्य पक्षीही वापरताना दिसतात. साधारण मैनेच्या आकाराच्या ब्लॅकबर्डचे नावाप्रमाणे शरीर करडट काळे असून चोच, पाय आणि डोळ्याभोवतीचे वर्तुळ पिवळे असते. ओळखण्यास अतिशय सोपा असलेला हा पक्षी समुद्रसपाटीपासून साधारण ७०० फूट उंचावरील डोंगर रागांमध्ये आढळतो. माथेरान, लोणावळा, भीमाशंकर, महाबळेश्वर आदी ठिकाणी पावसाळ्यात अळ्या, गांडुळे, किडे शोधणारे तर कधी जंगली फळांवर तुटून पडणारे ब्लॅकबर्डस् सतत दिसत असतात. पावसाळी ट्रेक्स करणाऱ्या ट्रेकर्सनाही सर्व डोंगरांवर ब्लॅकबर्ड आणि त्याची घरटी दिसतात.