ठाणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर ठाणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्य़ात सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी विविध ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांत काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचे प्रकारही समोर आले. तर, बदलापूर आणि अंबरनाथमधील काही भागांत घरांची पडझड झाली. ठाण्यात झाड कोसळून एकजण किरकोळ जखमी झाला. ठाणे शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या वेळी वादळात ६५ झाडे उन्मळून पडली. तर, १९ झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पाचपाखाडी भागातील उत्सव हॉटेलसमोर एक मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. शीळ-डायघर परिसरात एक मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने एका चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्यावरही एक झाड कोसळले होते. त्यामुळे दुपारी काही कालावधीसाठी वाहतूक कोंडी झाली होती. बदलापूर-अंबरनाथमध्ये वीज गायब गुरुवारी सकाळच्या वेळी १० च्या सुमारास अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाचा जोर वाढला होता. अंबरनाथच्या चिंचापाडा भागात एका घराचा छज्जा कोसळल्याने परिसरात घबराट पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील १८ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. दुपारनंतर अधूनमधून सूर्याचे दर्शनही होत होते. त्यामुळे नागरिकांची बाजारात गर्दी झाली होती. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही अंबरनाथमध्ये गुरुवारीही अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. बदलापूर पूर्व भागातही काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.