राजावली ग्रामस्थांचे हाल वसई : वसईकरांवर पुराचे संकट लादणारा अनधिकृत पूल महापालिकेने जमीनदोस्त केला असला तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या पुलासोबत राजावली ग्रामस्थांसाठी महत्त्वपूर्ण असलेला साकवही तोडून टाकला आहे. या साकवामुळे राजावली ग्रामस्थ वसईत ये-जा करायचे. मात्र आता त्यांचा मार्गच बंद झाला असून त्यांना आता नायगाव किंवा गोखिवरेला वळसा घालून वसईत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसई पूर्वेच्या राजावली खाडीत भराव टाकून एक पूल बांधण्यात आला होता. हा पूल कुणी बांधला हे अजूनही समजलेले नाही. मात्र हा पूल वसईकरांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या पुलासाठी खाडीच्या पात्रात भराव टाकून लोखंडी पूल बांधण्यात आला होता. यामुळे शहराचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आणि शहरात पूर आला. त्यामुळे महापालिकेने हा पूल तोडला. मात्र पालिकेने हा पूल तोडतानाच या भागात असलेला एक जुना लाकडी साकवही तोडून टाकला. त्यामुळे राजावली ग्रामस्थांचा वसईला येण्याचा मार्ग बंद झाल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. हा साकव खूप जुना होता. वसईला ये-जा करण्याचा जवळचा मार्ग होता. गावातील कामगार, शेतकरी याच मार्गाने दररोज वसईला ये-जा करतात. या साकवमुळे आम्ही १५ मिनिटांत खाडी पार करून वसईला पोहोचत असू, असे ग्रामस्थ विवेकानंद म्हात्रे यांनी सांगितले. आता गावकऱ्यांना वसईला येण्यासाठी राजावलीहून नायगाव किंवा राजावली-गोखिवरे मार्गाने यावे लागत आहे. त्यासाठी एक तास ते दीड तास लागतो. हा मार्ग वेळखाऊ आणि खर्चीक असल्याचे त्यांनी सांगितले. हा साकव जुना होता आणि मोडकळीस आलेला होता. मात्र कारवाईच्या वेळी तो आम्ही पाडला नव्हता, असे प्रभारी साहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी सांगितले.