रामदास पाध्येंच्या ‘बोलक्या बाहुल्यां’चे वर्षभर कार्यक्रम ‘बोलक्या बाहुल्यांना’ बोलते करणारे शब्दभ्रमकार रामदास व अपर्णा पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या परिवारातील ‘अर्धवटराव’ यांनी या वर्षी शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. निर्जीव बाहुल्यांमध्ये सजीवाचा भाव असतो, असा दावा करत पाध्ये कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून बोलक्यांचा बाहुल्यांचे ९ हजार ८०० प्रयोग करू शकले. या बाहुल्यांमधील अर्धवटराव (चक्रमशास्त्री) यांनी या वर्षी वयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे अर्धवटरावांच्या शतकोत्तरी उत्सवाचा आणि पाध्ये कुटुंबीयांच्या बोलक्या बाहुल्यांमधील प्रवासाबद्दलचा मुलाखतीचा कार्यक्रम डोंबिवलीत रविवारी आयोजित केला होता. कलेला अवकाश नसते, त्याप्रमाणे बोलक्या बाहुल्यांची कला विस्तारत आहे, बहरत आहे. अर्धवटरावांच्या शंभरीनिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. अमेरिकेत जाण्यासाठी कोकणातून केलेल्या कार्यक्रमातून आठ हजार रुपये मिळाले होते. त्याची उतराई होण्यासाठी कोकणात एक कार्यक्रम करणार आहे. अमेरिकेत काही कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुंबईत ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान अर्धवटरावांच्या शंभरीचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अर्धवटरावांच्या शंभरीनिमित्त एक चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे, रामदास यांनी सांगितले. पाध्ये कुटुंबात २००२ बोलक्या बाहुल्या आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र सदनिका आहे. तेथे त्यांचा कुटुंब गाडा चालतो. अर्धवटराव व आवडाबाई हे आपल्या घरातील एक महत्त्वाचे घटक असल्याने ते आम्ही राहतो त्याच ठिकाणी राहतात. त्यांच्यासाठी घरात स्वतंत्र खोली, कपाट, खाट अशी व्यवस्था आहे, असे रामदास पाध्ये यांनी सांगितले. अर्धवटरावांची पाश्र्वभूमी अर्धवटराव हा आपल्या वडिलांनी तयार केलेला मुखवटा. अर्धवटरावांचे मूळ नाव क्रेझी, त्यानंतर ते चक्रमशास्त्री झाले. अर्धवटरावांचा जन्म १९१६ सालचा आहे. वडील जादूचे प्रयोग करायचे. त्यामधून बोलक्या बाहुल्यांचा जन्म होत गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर एक परदेशस्थ आले होते. त्यांच्याकडून वडिलांनी बोलक्या बाहुल्यांची कला शिकून घेतली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अकरा वर्षे बोलक्या बाहुल्यांशी संवाद साधण्याचा रियाझ केला. पदव्युत्तर अभियंत्याचे (एम.ई.) शिक्षण पूर्ण केले. बोलक्या बाहुल्यांचा खेळ विकसित करण्यात जवळील तांत्रिक शिक्षण खूप उपयोगी पडले, असे रामदास पाध्ये यांनी सांगितले.